वारुळे हीच भूजलाची निदर्शके
या भागात आपण पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी भूजलातील पाण्यावर केलेल्या संशोधनाबाबत माहिती घेणार आहोत. वारुळे आणि भूजल साठा यांच्या परस्परसंबंधांविषयी या शास्त्रज्ञांनी अत्यंत महत्त्वाची माहिती उजेडात आणली आहे.
वराहमिहिराने वारूळ व ऍक्वीफर (भूगर्भातील पाण्याचा झरा) यांच्यातील अंतर दिले आहे व पाण्याची खोली ३.४३ मी. ते १६० मी. पर्यंत आढळते असे सांगितले आहे. तैत्तरीय अरण्यकात वाळवींचे उपदिका असे वर्णन केले आहे. त्या जेथे खणतात तेथे पाणी मिळते असे सिंडर या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले आहे. वाळवीच्या खोदण्याची खोली पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. कार्ल-फ्रिशन शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनानुसार वारुळामध्ये अनेक उभी बिळे जमिनीमध्ये आढळतात, त्यापैकी एखादे खूप खोल असते. वराहमिहिराच्या अभ्यासावरून असे गृहीत धरता येते, की एक उभे बिळ भूमिगत पाण्यापर्यंत पोचते. काही ठिकाणी वारुळाच्या अगदी खाली पाण्याजवळ जाणारे बिळ उभे असते, असे वॅटसनने दाखविले.
पॉलीकॅली
वारूळ हे अनेक स्वतंत्र लहान-लहान घटकांचे नगरच असते. या घटकांना कॅली असे म्हणतात. जे वारूळ असंख्य कॅलींनी बनलेले असते, त्याला पॉलिकॅली असे म्हणतात. यांच्यामध्ये अंतर्गत रचना ही एकसारखीच असते. या प्रकारच्या वारुळात एक मोठी पोकळी भूजलापर्यंत असते.
मराईसचे निरीक्षण
मराईस या शास्त्रज्ञाने दक्षिण आफ्रिकेतील वॉटरबर्ग जिल्ह्यात अभ्यास केला, त्या वेळी तेथे तीव्र दुष्काळ पडला होता. तो भाग डोंगराळ होता व ४० फूट खोलीपर्यंत पाणी सापडणे तेथे अशक्य होते. तेथेच एका टेकडीच्या माथ्यावर वाळवीची वारुळे होती. ती उघडली असता तेथे आश्चर्यकारकरीत्या आतील भाग हा दमट आढळला. वाळवींनी पाणी मिळविण्यासाठी कमीत कमी शंभर फूट खोलीपर्यंत खणले होते. पाण्यापर्यंत जाणारी पोकळी वारुळापासून ६५ फूट अंतरापर्यंत होती. नंतर ती दिशेनासी झाली. वारुळात दर दोन-तीन फुटांवर बुरशीचा समूह होता. जो पाण्याचे निदर्शक आहे. वाळव्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात, की त्या खोलीवर विश्वास ठेवणे अशक्य आहे.
फ्रेटोफाईट्स्च्या भोवती वाळवीची वारुळे आढळतात. या वृक्षांच्या प्राथमिक मुळांबरोबर वाळव्या खोलवर पाण्यापर्यंत पोचतात व त्यांच्या वारुळाचा विस्तार आडव्या वाढणाऱ्या मुळांसोबत होतो. वृक्षांना (मुळांना) जमिनीत खोल जाण्यात वाळवीच्या पोकळीचा उपयोग होतो. त्या वाळवी मुळांना इजा पोचवीत नाहीत. मुळांमुळे आर्द्रता राखण्यास मदत होते.
वराहमिहिराने वाळवीची वारुळे व त्यांच्या भोवतीची वनस्पती यावरून भूजलाची उपलब्धता यांचे अनुमान काढले. पाण्याच्या उपलब्धतेवर तेथे वाढणाऱ्या वनस्पतींच्या जाळी व उगवणे अवलंबून असते. वृक्षांमुळे वारुळांमधील आर्द्रता राखण्यास मदत होते.
जैविक वातावरण (परिस्थिती) :
वराहमिहिराने वाळव्यांचा बांध (Termite Mound) हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भूजलाचा दर्शक मानला आहे. लाकूड, बांधकामासाठी वापरले जाणारे लाकूड, कागद, कपडे, विशिष्ट वनस्पती व पिकाचे नुकसान वाळवी करतात, तरीसुद्धा त्या मनुष्याच्या उपयोगाच्या आहेत. वाळवी आणि वाळवीयुक्त माती यासंबंधी उल्लेख वैदिक काळापासून प्राचीन संस्कृत वाङमयामध्ये आढळतो. संस्कृत साहित्यात वाळवीला अनेक म्हणजे उपजिका, उपजिविका, उपधिका, देहिका, उपदीपिका, उपदेहिका, उद्देहिका अशा संज्ञा वापरल्या आहेत. जमिनीवर वारुळे करणाऱ्या वाळवींचे अनेक प्रकार आहेत असे बूमफिल्ड (१८८६) या शास्त्रज्ञाने म्हटले आहे.
व्हिटनी शास्त्रज्ञाने केलेल्या स्पष्टीकरणानुसार ज्या जमिनीमध्ये मोठी-मोठी वारुळे तयार केली जातात, ते एक प्रकारचे बांध-बंधारे आहेत. या वारुळांमध्ये आर्द्रता असते. त्या आर्द्रतेमध्ये रोग बरा करण्याचा गुणधर्म असतो. आर्द्र वातावरण हे वाळव्यांसाठी पोषक अथवा आरोग्यासाठी चांगले सांगितले आहे. बूमफिल्डच्या मतानुसार वाळवींना निसर्गतः जलनिर्मितीची शक्ती असते आणि ते रोग बरा करणारे औषधी पाणी असते. वाळवींना निसर्गतः खणण्याची किंवा पोखरण्याची शक्ती प्राप्त झालेली असते. त्या शक्तीनुसार त्या उपयुक्त पाणी मिळवतात. वाळवीने निर्माण केलेल्या मातीचे औषधी गुणधर्म हिंदूंच्या प्राचीन ग्रंथात वर्णन केले आहेत. आफ्रिकेमध्ये झिंबाब्वेमध्ये सोन्याच्या खाणीत वाळवीच्या वारुळाचा अभ्यास वॅटसनने केला असता त्याला वारुळे खोदल्यानंतर ७० ते ८० फुटांवर पाणी आढळले.
क्रमश:
- डॉ. सौ. रजनी जोशी, बार्शी, जि. सोलापूर ९९२१०७७६२३ (संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)
नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....
No comments:
Post a Comment