स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Saturday, May 30, 2009

शोध भुगर्भातील पाण्याचा-५

साभार-अँग्रोवन/३०.०५.२००९

मातीचे प्रकार सांगतात पाणीसाठ्याचा मार्ग

एखाद्या प्रदेशात गवत, दुर्वा, वृक्ष, झुडपे किंवा वारूळ नसले तरी तेथील मातीच्या किंवा भूमीच्या काही वैशिष्ट्यांवरून भूगर्भात पाणी आहे की नाही हे ओळखता येते. त्याची काही उदाहरणे वराहमिहिराने खाली दिली आहेत:
जर भूमी अतिशय मऊ, खोलगट, थोडी वाळू असलेली किंवा नाद निर्माण करणारी असेल, तर साडेचार किंवा पाच पुरुष खोलीवर तेथे पाणी मिळते.

मऊ व चमकदार पाने असलेल्या वृक्षांच्या दक्षिणेला पाच पुरुष खोलीवर पाणी मिळते.

एखाद्या प्रदेशात जमिनीस उतार असून, त्यावर लोकांच्या रहदारीच्या खुणा असतील तर त्या भूगर्भात साडेसात हात खोलीवर पाणी मिळते.

विविध प्रकारच्या जंतूचे एकही वसतिस्थान आजूबाजूला नसून, फक्त एकाच ठिकाणी जंतूंचा पुंजका दिसत असेल तर त्या भूगर्भात साडेसात हात खोलीवर पाणी असेल.

उष्ण भूप्रदेशात थंड भूभाग किंवा थंड भूप्रदेशात उष्ण भूभाग आढळला, तर साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते.

वरील ठिकाणी जर वारूळ किंवा मासे आढळतील, तर चार हातावरच पाणी मिळते.

अनेक वारुळाच्या रांगेत एखादे वारूळ सर्वांत जास्त उंच असेल, तर त्याखाली चार हातावर पाणी मिळते.

एखाद्या ठिकाणी वनस्पती वाढून आपोआप जळून जातात किंवा अजिबात वाढत नाहीत, त्या ठिकाणी साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते.

जर वड, पळस व औदुंबर किंवा वड व पिंपळ यांची झाडे एकत्र आढळतील तर त्यांच्या खाली तीन हातावर उत्तरवाहिनी जलशिरा आढळते.

हे सिद्धांत सारस्वत ऋषीने केलेल्या "दकार्गला' नावाच्या ग्रंथातून वराहमिहिराने घेतले आहेत. यापुढील सिद्धांत मन नावाच्या ऋषीने केलेल्या ग्रंथातून घेतले आहेत, हे वराहमिहीर स्वतः प्रांजळपणाने कबूल करतो. मनूच्या ग्रंथाचे नावही "दकार्गला' असेच आहे. आता आणखी लक्षणे अभ्यासूया.

एखाद्या भूप्रदेशातील झाडांची पाने जर मऊ व चमकदार असतील किंवा तेथे वेलींच्या जाळी असतील किंवा कमळ, गोक्षुरा(गोखूर), उशीर(वाळा), गुंड्र (गुळवेस), काश, नलिका (दालचिनी) किंवा नल (देवनळ) नावाचे गवत भरपूर प्रमाणात उगवले असेल तर पंधरा हात खोलीवर तेथे पाणी मिळते.

खजूर, जांभूळ, अर्जुन, वेत, हस्तिकर्ण (शिंदणी), नागकेसर, शतपत्र (गजकर्णी), कदंब, करंज, सिंदुवार (निर्गुंडी), बिभीतक (बेहडा) किंवा मदयंतिका (मेहंदी) यांचे वृक्ष एखाद्या प्रदेशात असतील तर पंधरा हात खोलीवर पाणी मिळते.

दोन पर्वतांपैकी/डोंगरांपैकी जो उंच असेल त्याच्या पायथ्याशी पंधरा हात खोलीवर पाणी मिळते.

वराहमिहिराने वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा विचार केला आहे.

एखाद्या प्रदेशाची भूमी (माती) निळी असून, त्यात गोल गोटे आढळतील किंवा तांबडी असून तेथे मुंजा गवत, दुर्वा आणि वेत आढळतील तर त्या ठिकाणी पाणी असते.

भूमी वालुकामय असून, तांब्याच्या रंगाची असेल तर तेथे तीव्र चवीचे पाणी मिळते.

तपकिरी/तांबूस रंगाच्या भूमीत खारे पाणी आढळते.

पांढऱ्या रंगाची भूमी खारट पाणी देते.

निळ्या रंगाची भूमी गोड पाणी देते.

वृक्षांच्या किंवा वेलींच्या पानाला छिद्रे असतील तर त्यापासून दूर अंतरावर पाणी असते.

सूर्य, अग्नी, राख, उंट किंवा गाढव यांच्यासारखा रंग असलेल्या मातीच्या भूमीत पाणी मिळत नाही.

करीर वृक्षातून दूध येत असून, त्याला तांबडे कोंब येत असतील तर त्याच्या खाली पाणी असते.

जर एखादा खडक वैडूर्य (पाचू), हिरवे, मूग, काळा मेघ, नीलमणी, पिकलेले अंजीर किंवा काजळ यासारख्या किंवा तपकिरी रंगाचा असेल तर त्याच्याखाली भरपूर पाणी मिळते.

कबुतर, मध, तूप, रेशीम किंवा सोमलता यासारख्या रंग असलेल्या खडकाच्या खालीदेखील पाणी मिळते.

तांबडा, राखाडी रंगाचा, उंट, गाढव, मधमाशी यांच्यासारखा किंवा काळ्या-तांबड्या फुलासारखा रंग असलेल्या खडकाखाली अजिबात पाणी मिळत नाही.

चंद्र, स्फटिक, मोती, सुवर्ण, नीलमणी, काजळ, हरिताल किंवा उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखा रंग असलेले खडक किंवा दगड पाण्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असतात.

खडक फोडण्याची प्रक्रिया:
भूमिगत पाणी शोधून काढताना पुष्कळदा शेवटी खडक लागतो, याचा उल्लेख लेखात अनेकदा आला आहे. खडक फोडतेवेळी काही वेळेला खडक अजिबात फुटत नाही. हल्लीच्या काळात डायनामाईट किंवा सुरुंगाची दारू लावून फोडतात, परंतु पूर्वीच्या काळी खडक फोडण्यासाठी ज्या काही युक्‍त्या वापरीत, त्या वराहमिहिराने सांगितल्या आहेत.

एखादा खडक फुटत नसेल तर त्यावर तिंदुक (टेंभूर्णी) व पळस यांचे ओंडके तो खडक लाल होईपर्यंत जाळावे. नंतर त्या खडकावर चुनकळीचे पाणी ओतावे व नंतर खोदावे म्हणजे तो खडक फुटतो.

मोक्षक (मोखा) झाडाच्या फांद्या जाळून, त्यांची राख वेत जाळून केलेल्या राखेत मिश्र करावी. हे मिश्रण पाण्यात खूप वेळ उकळावे आणि लेखात वर सांगितल्याप्रमाणे तप्त झालेल्या खडकावर ते मिश्रण सात वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी खडक तापवावा, म्हणजे खडक फुटतो.

ताक, अज्जिक (म्हणजे पिठापासूनच केलेले एक प्रकारचे आंबट द्रव्य) व दारू यांचे कुळीथ व बोरे यांच्याशी मिश्रण करून सात रात्री ते मिश्रण ठेवावे व उपरोक्त पद्धतीने तप्त केलेल्या खडकावर ते मिश्रण आठव्या दिवशी ओतावे म्हणजे खडक फुटतो.

लिंबाची पाने व साल, तिळाचे बुंधे, अपामार्ग (म्हणजे आघाडा) तिंदुक आणि अमृतावेल हे सर्व एकत्र जाळून राख करावी. गोमूत्रात त्याचे मिश्रण करावे. हे मिश्रण तापविलेल्या खडकावर सहा वेळा ओतावे. प्रत्येक ओतण्याचे वेळी खडक तापवावा.

पाणी साठवून ठेवण्याचे उपाय ः
भूगर्भातून आणि आकाशातून मिळालेले पाणी कसे साचवून ठेवावे, कशा तऱ्हेचे तलाव बांधावे यासंबंधीसुद्धा काही सूचना पूर्वाचार्यांनी केल्या आहेत, त्यांची माहिती घेऊ.
आयताकृती तळे करावे. त्याच्या पूर्व व पश्‍चिम दिशेची लांबी दक्षिण-उत्तर दिशेच्या लांबीपेक्षा जास्त असावी, म्हणजे त्यातील पाणी जास्त दिवस पुरते. कारण दक्षिण- उत्तर दिशेची लांबी जास्त असल्यास त्या भिंती सोसाट्याच्या वाऱ्याने लवकर झिजतात. पूर्व-पश्‍चिमेच्या भिंती झिजत नाहीत. जर तलावाची दक्षिण-उत्तर बाजू जास्त लांबीची करावयाची असेल, तर त्या बाजू विटांनी, दगडांनी किंवा लाकडांनी भक्कम बांधून घ्याव्यात. तलावाचा तळदेखील अनेक हत्ती बरेच दिवस चालवून पक्का करावा. जमल्यास तोही बांधून काढावा. तलावाच्या काठी अर्जुन, वड, आंबा, पिंपळ, प्लक्ष(पळस), कदंब, जांभूळ, वेत, ताड, अशोक, मधूक (मोहा) आणि बकुळ हे वृक्ष लावून विहिरीचे सदर झाकून टाकावे, तसेच पाणी जाण्यासाठी तळाशी दगडांनी बांधून काढलेले एक छिद्र असावे.
                                                                                                                                                                          क्रमश:

- डॉ. सौ. रजनी जोशी, बार्शी, जि. सोलापूर ९९२१०७७६२३
(संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)




नाशिक जिल्ह्यातील सर्व  विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना  जाहीर आवाहन....



जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६""नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
१. ११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
२. ११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
३. ११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
४. ११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
५. ११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
६. ११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
७. ११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
८. ११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
९. ११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१०. १२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
११. १२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२. १२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१३. १२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१४. १२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१५. १२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१६. १२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१७. १२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१८. १२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१९. १२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा


शोध भुगर्भातील पाण्याचा-५SocialTwist Tell-a-Friend

1 comment:

  1. sir this i very useful for me but i want more parts of this topic totel 12 parts of this topic but i seen only 6 parts if possible u provide 12 parts of this topic
    thanks for this hel
    b.modi
    modi.balaji@gmail.com

    ReplyDelete