साभार-लोकसत्ता/विशेष-२३.०७.२००९/अस्मिता निकम
जलनियोजन आणि जलव्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचे असाधारण महत्त्व वरील मथळ्यांमुळे कुणाच्याही लक्षात यावे. मोसमी पावसाची अनिश्चितता, इलेक्ट्रिक पंपांचा वापर करून खोल भूगर्भातून मोठय़ा प्रमाणावर होत असलेला पाण्याचा उपसा आणि जमिनीतील व अनुषंगाने पाण्यातील वाढणारे क्षारांचे वाढते प्रमाण हे प्रश्न महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर सर्व विकसित देशांना आज भेडसावत आहेत. या संदर्भात पावसाच्या पाण्याचा साठा करणे, जमिनीतील नैसर्गिक स्रोतांची जपणूक करणे आणि सर्वसाधारणपणे जलसंवर्धन करणे ही आजची गरज आहे. या संदर्भात मोठे खर्चिक प्रकल्प किंवा धरणे हीच उपयोगी ठरतील हा प्रचलित गैरसमज आहे. छोटय़ा बंधाऱ्यातून अडवलेल्या पाण्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सारख्या साध्या छोटय़ा प्रकल्पातून तसेच तळी किंवा नद्या यातील पाण्याचे साठे एकमेकांना जोडण्यासारखे अभिनव उपक्रम हेही याबाबतीत खूप प्रभावी ठरू शकतात. गुजरात आणि राजस्थानात अंबुजा सिमेंट फाऊंडेशनने राबविलेले काही प्रकल्प भूजल संवर्धनाच्या दृष्टीने खूप यशस्वी आणि म्हणूनच लक्षणीय ठरतात. त्यांची माहिती सर्वानाच उद्बोधक ठरावी.
पश्चिम गुजरातमध्ये मूलद्वारका येथे शिंगोडा नदी अरबी समुद्राला मिळते. जमिनीच्या उतारामुळे या ठिकाणी नदीच्या पाण्याला तीव्र वेग असतो. त्या पाण्याचा निचरा झपाटय़ाने होतो. याखेरीज वेगाने वाहणाऱ्या पाण्याला रोखून धरण्याकरिता बंधारा बांधण्याची कल्पना तज्ज्ञांना योग्य वाटत नव्हती. अशा स्थितीत, फाऊंडेशनच्या तज्ज्ञांनी एक अभिनव प्रयोग केला. या प्रयोगांतर्गत त्यांना जमिनीखालून पाइप टाकून नदीचे पाणी वळवून घेऊन एका कृत्रिम बंधाऱ्यापर्यंत आणायचे होते. याकरिता ९९ मिमी. व्यासाची जवळजवळ पाऊण किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकायचे ठरले. परंतु ही जलवाहिनी खासगी जमिनीतून नेणे आवश्यक होते. या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी गावकऱ्यांचे सहकार्य आणि सहभाग या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत हे लक्षात घेऊन चार गावातील सर्व जनतेला कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतले. या योजनेमुळे त्यांना होणारे फायदे समजावून सांगितले.
या प्रक्रियेला काही महिन्यांचा कालावधी लागला जरूर, परंतु हळूहळू सर्वसामान्यांचा प्रकल्पाला पाठिंबा वाढू लागला. भूधारकांनी त्यांची शेते खणून तिथे ही जलवाहिनी टाकायला होकार दिला. जमीन खणून त्यात पाइप टाकण्यात आले आणि पुन्हा जमीन पूर्ववत करण्यात आली.

या प्रकल्पामुळे २००६ च्या पावसाळ्यात प्रथमच ४.४६ दशलक्ष घनमीटर पाणी बंधाऱ्यात साठवले गेले. या पाण्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी मोठा उपयोग आजही होत आहे. या बंधाऱ्याचा आणखी एक मोठा लाभ झाला. जलसंचयाभोवती सुमारे २०० शेतविहिरींमधील पाण्याचा स्तर १२ मीटरहून अधिक उंचावला. साहजिकच, या भागातील शेतकरी आता वर्षांतून दोन किंवा तीन पिके घेऊ शकतात.
दुसरा प्रकल्पही पश्चिम गुजरात येथीलच आहे. कोडीनार या समुद्रालगत वसलेल्या गावातील गोडय़ा पाण्यातील क्षारांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले होते. समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी जमिनीवर येऊन आणि झिरपून ही समस्या निर्माण होत होती. या वाढत्या क्षारांच्या समस्येमुळे कोडीनारमधील जनतेला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्याच्या कार्यवाहीने कोडीनारमधील क्षारयुक्त पाण्याची समस्या कायमची दूर झाली असून गोडय़ा पाण्याच्या वाढत्या मुबलकतेमुळे तेथील शेतकऱ्यांना आता दरसाल तीन पिके घेणेही शक्य होत आहे.
कोडीनार गावातून ‘गोमा’ नदी अरबी समुद्राला मिळते. जमिनीच्या नैसर्गिक उतारामुळे गोमा नदीचा प्रवाह तीव्र वेगाने समुद्राला भिडतो. त्यामुळे नदीचे पाणी साठविणे किंवा त्यांचा अन्यत्र संचय करणे अशक्यप्राय होते. त्याचबरोबर, कोडीनारच्या परिसरात मितिझ, देवळी, कडोदर, दमली आणि पिवली ही पाच तळी आहेत. जमिनीतील अतिरिक्त क्षारांमुळे या तळ्यातील पाणीही पिण्याकरिता किंवा शेतीकरिता कमअस्सल बनू लागले होते. गावात वाहती नदी असून आणि पाच तळ्यांचा सहवास लाभूनही कोडीनारचे रहिवासी क्षारयुक्त पाण्यामुळे त्रासले होते.
अंबुजा फाऊंडेशनने ही समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तज्ज्ञांचे म्हणणे पडले की, समुद्रानजिक गोडय़ा पाण्याचा साठा निर्माण करून त्या पाण्याचा धन भार समुद्राच्या पाण्यापेक्षा अधिक केला तर जमिनीत झिरपणारे समुद्राचे क्षारयुक्त पाणी कमी होईल. या प्रकल्पांतर्गत सर्वप्रथम पाचही तळ्यांची कालव्यांद्वारे जोडणी करण्यात आली. प्रत्येक तळ्यातील गाळ काढून पाण्याच्या स्तंभाची उंची पद्धतशीरपणे वाढविण्यात आली, हा पहिला टप्पा झाला.
दुसऱ्या टप्प्यात गोमा नदीतून एक कालवा काढून सर्वाधिक उंचीच्या तळ्याशी जोडला. परिणामत: पावसाळ्यात गोमा नदीचे पाणी जेव्हा एका विशिष्ट पातळीच्या वर जाऊ लागले तेव्हा ते नैसर्गिक दाबामुळे कालव्यातून सर्वाधिक उंचीच्या पहिल्या तळ्यात आपोआप येऊन पडू लागले. पहिले तळे पाण्याने भरल्यानंतर अतिरिक्त पाणी गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे दुसऱ्या कालव्यात जाऊ लागले. गोमा नदीच्या गोडय़ा पाण्याने पाचही तळी पुरेपूर भरली. काही वर्षांत स्वाभाविकच पाण्यातील क्षारांचे प्रमाण खूप कमी झाले. या परिसरातील शेतकरी आता वर्षांतून तीन पिके घेतात. या परिसरात आता १२१ नव्या फळबागा विकसित झाल्या असून त्यांचे आर्थिक लाभ १९७ हेक्टर जमिनीवरील १८२ शेतकरी घेत आहेत.
दर वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा ग्रामीण तसेच नागरी भागातील जनतेला बसतात. पिण्याच्या पाण्याची टंचाई हा काही केवळ भारतीयांना भेडसावणारा प्रश्न नाही. पूर्ण जगालाच गोडय़ा पाण्याची कमतरता तीव्र स्वरूपात जाणवत आहे. 
एकूण भूजलातील ७६ टक्के पाणी शेतीसाठी १२ टक्के उद्योगासाठी तर उर्वरित अन्य घरगुती कारणांसाठी वापरले जाते. निसर्गदत्त साधनसंपत्तीचा दुरुपयोग, विकसित तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि निसर्ग तसेच पर्यावरणाप्रती जनसामान्यांची उदासीनता यामुळेच ही समस्या उद्भवलेली आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. तरीही राजस्थानसारख्या भूभागाला प्राचीन काळापासून पाण्याची समस्या भेडसावत आली आहे. आपल्याला हजारो किलोमीटर लांबीच्या किनाराही लाभलेला आहे. समुद्राच्या पाण्यामुळे किनाऱ्यानजिक जमिनीत तसेच भूगर्भातील पाण्यात क्षारांचे प्रमाण चिंताजनक प्रमाणात वाढले आहे. क्षारयुक्त पाण्याने आरोग्याचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच त्यामुळे जमीनही नापीक होते. या प्रश्नांचे स्वरूप अधिक गंभीर होण्यासाठी काही अन्य घटकही कारणीभूत आहेत.

एकूण भूजलातील ७६ टक्के पाणी शेतीसाठी १२ टक्के उद्योगासाठी तर उर्वरित अन्य घरगुती कारणांसाठी वापरले जाते. निसर्गदत्त साधनसंपत्तीचा दुरुपयोग, विकसित तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि निसर्ग तसेच पर्यावरणाप्रती जनसामान्यांची उदासीनता यामुळेच ही समस्या उद्भवलेली आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. तरीही राजस्थानसारख्या भूभागाला प्राचीन काळापासून पाण्याची समस्या भेडसावत आली आहे. आपल्याला हजारो किलोमीटर लांबीच्या किनाराही लाभलेला आहे. समुद्राच्या पाण्यामुळे किनाऱ्यानजिक जमिनीत तसेच भूगर्भातील पाण्यात क्षारांचे प्रमाण चिंताजनक प्रमाणात वाढले आहे. क्षारयुक्त पाण्याने आरोग्याचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच त्यामुळे जमीनही नापीक होते. या प्रश्नांचे स्वरूप अधिक गंभीर होण्यासाठी काही अन्य घटकही कारणीभूत आहेत.
देशाची वाढती लोकसंख्या, ऊस, नारळअशा नगदी परंतु अधिक पाणी शोषणाऱ्या पिकांचे वाढीव उत्पादन, खोल भूगर्भातील पाणी खेचून काढण्यासाठी डिझेल तसेच इलेक्ट्रिक पंपाचा होणारा वापर आणि पाण्याचा गैरवापर यामुळे भूगर्भातील गोडय़ा पाण्याचे साठे कमी होत आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन असे प्रकल्प स्थानिक रहिवाशांच्या मदतीने उभे केल्यास समस्या चिंताजनक राहणार नाही.
- अस्मिता निकम
No comments:
Post a Comment